पैठण- येत्या शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे.उरल्या सुरल्या पितरांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे. त्यादिवशी ग्रामीण भागात निमंत्रित लोकांसाठी जेवणावळी घालतात.परंतु, यंदा दुष्काळाचे सावट असल्याने अशा जेवणावळी दुर्मिळ झाल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या पित्रपंधरवडा सुरू आहे.मृत व्यक्तीच्या मृत्यू तिथीचा अभ्यास करून पित्र पंधरवड्यातील तिथी निवडली जाते.त्यादिवशी कावळ्याला विशेष महत्व असते.पितरांसाठी नातलग,
गावातील अथवा विशेष लोकांना जेवणासाठी बोलावले जाते. मात्र यंदा या जेवणावळी दुर्मिळ झाल्याचे दिसत आहे.पाऊस नसल्याने खरीप हातातून गेला आहे.आलेल्या शेतमालालाही भाव नाही. त्यामुळे खर्चाचे वांधे झाले आहेत.परिणामी अनेकजण जेवणावळी रद्द करून केवळ प्रथा म्हणून नैवेद्य ठेवताना दिसत आहेत.ज्याला तिथी माहिती नसते ते सर्वपित्री अमावस्येला नैवेद्य ठेवतात. यादिवशी उरलेसुरले पितर येतात असे बोलले जाते.