नवी दिल्ली
सर्वसमावेशक वाढीमुळे विकासाचा वेग वाढेल, परंतु श्रीमंतांवर कर लावणे हा उपाय नाही, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “मला वाटते की, जे लोक चांगले काम करत नाहीत त्यांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करु शकतो. त्यामुळे सर्वसमावेशक विकासाचा वेग वाढण्यास मदत होईल,” असेही ते म्हणाले.
मणिपूरमधील वांशिक संघर्षाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “भारतात जे घडत आहे ते दोन समुदायांमधील भांडण नाही. एका समाजाला दुसऱ्या समाजापेक्षा जास्त मिळते आहे हे लक्षात आल्याने ही लढाई नोकरी आणि आरक्षणासाठीची आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील ज्या घटकांना फायदा झाला नाही त्या घटकांची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे.”