कोची – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, माजी बौद्धिकप्रमुख आणि कर्मयोगी रंगा हरी यांचे काल रविवारी येथील अमृता रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
रंगा हरी यांचा जन्म ५ डिसेंबर १९३० रोजी त्रिपुनिथुरा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रंगा शेणॉय, तर आईचे नाव पद्मावती होते. त्यांना तीन भाऊ आणि चार बहिणी होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट अल्बर्ट्स हायस्कूल येथे झाले आणि कोचीतील महाराजा कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली होती.रसायनशास्त्रात बीएस्सी करण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र, शिक्षणादरम्यान तुरुंगवास भोगून परतल्यावर ते बीएस्सी करू शकले नाहीत. नंतर त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि स्वतंत्रपणे संस्कृत शिकले.
टी.डी. मंदिराच्या क्रिडांगणातून त्यांनी संघदर्शनाचा ध्वज घेऊन जगभ्रमंती केली. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे संघजीवन सुरू झाले होते. संघाचा संदेश देण्यासाठी रंगा हरी यांनी पाच देशांमध्ये प्रवास केला. गोळवलकर गुरुजी, मधुकर देवरस, प्रो. राजेंद्रसिंह, कुप्प. सी. सुदर्शन आणि डॉ. मोहन भागवत अशा पाच सरसंघचालकांसोबत त्यांनी काम केले.
महात्मा गांधींच्या हत्येनंतर डिसेंबर १९४८ ते एप्रिल १९४९ या कालावधीत रा. स्व. संघावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर रंगा हरी यांनी तुरुंगात सत्याग्रही म्हणून काम केेले. रंगा हरी यांनी संस्कृत, कोंकणी, मल्याळम्, हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांतील ५० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले. या व्यतिरिक्त त्यांचे गुजराती, बंगाली आणि असामी भाषेवरही प्रभुत्व होते. त्यांनी श्रीगुरुजींच्या ‘समग‘ गुरुजी’ या संपूर्ण ग्रंथाचे संपादन आणि संकलन केले, जे १२ खंडांमध्ये प्रकाशित झाले. पृथ्वी सुक्त हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले होेते.