पालघर- वाढवण बंदराच्या जनसुनावणीच्या सभा मंडपात आज 46 गावांतील स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार, शेतकऱ्यांनी घोषणाबाजी देत या बंदराला जोरदार विरोध केला. कोणत्याही परिस्थिती आम्ही हे बंदर होऊन देणार नाही, अशी भूमिका या आंदोलकांनी आपल्या घोषणातून मांडली. घोषणा आणि गोंधळाच्या वातावरणात प्रशासनाने ही जनसुनावणी रेटली.
पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात होणारी जनसुनावणी पुढे ढकलावी, नाहीतर आम्ही जनसुनावणी विरोध करणार असल्याचा विरोध स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार आणि शेतकऱ्यांनी दिला होता. त्यामुळे जनसुनावणीच्या सभा मंडप परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. जनसुनावणीवेळी सभा मंडपात ग्रामस्थांनी जोरदार घोषणा करत आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे जनसुनावणीत काही काळ गोंधळ उडाला. ‘या बंदराबाबत शासनाकडे अजून अपूर्ण माहिती आहे, तरी देखील सुनावणी रेटत आहे. या जनसुनावणीत सरकारने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून लोक आणली होती. या लोकांना आधी मंडपातून बाहेर काढा, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत हे बंदर नकोच,’ असे सांगत आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला. ग्रामस्थांचा विरोध असूनदेखील प्रशासनाने ही जनसुनावणी पार पडली.