समीर वानखेडेंविरोधात सबळ पुरावे असल्याचा एनसीबीचा हायकोर्टात दावा

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येशी संबंधीत अंमलपदार्थांच्या प्रकरणात अटकेत असलेले अंमली पदार्थी विरोधी पथकाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर असलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे असून त्याबाबत आपल्याकडे भक्कम पुरावे आहेत,असा दावा एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयात केला.
एनसीबीने आपल्यावर बजावलेल्या नोटिसांना वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान एनसीबीने हा दावा केला.वानखेडे यांच्या याचिकेवर १ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने एनसीबीला आपली भुमिका मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एनसीबीने काल झालेल्या सुनावणीप्रसंगी शपथपत्रावर आपली भूमिका मांडली.
वानखेडे यांनी तपासात अडथळे आणण्यासाठी अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या याकिदा दाखल केल्या आहेत. त्यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडेही याचिका दाखल केली होती. मात्र लवादाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. एनसीबीकडून सुरू असलेला प्राथमिक तपास टाळण्यासाठी वानखेडे याचिकांचा वापर करीत आहेत,असा आरोप एनसीबीने शपथपत्रातून केला आहे.एनसीबीचे उप महासंचालक संजय सिंह यांच्या स्वाक्षरीने हे शपथपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
वानखेडे यांच्याविरोधात अज्ञात व्यक्तिंकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. यातील आरोप अत्यंत गंभीर असल्याचे आढळून आले. त्यामुळेच याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे,असेही शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.
वानखेडे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राजीव चौहान यांनी युक्तिवाद केला.वानखेडे यांची चौकशी संजय सिंह यांनी करु शकत नाहीत, कारण सिंह हे त्यावेळी वानखेडे यांचे वरीष्ठ अधिकारी होते. त्यामुळे तपासात होत असलेल्या प्रगतीची प्रत्येक टप्प्यावर त्यांना वानखेडेंकडून माहिती दिली गेली होती,असा युक्तिवाद चौहान यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top