*३५०० कोटींचा अपेक्षित
खर्च ८ हजार कोटींवर !
मुंबई – मुंबईकरांना लोकसंख्येनुसार पुरेसे पाणी मिळावे म्हणून समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी घेतला आहे.मात्र या प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधीच त्याचा अपेक्षित खर्च दुप्पटीपेक्षा अधिक वाढला आहे. हा खर्च ३५०० कोटींवरून ८ हजार कोटींच्या घरात पोहचला आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची पुढील २० वर्षे देखभाल, संचालन तसेच जीएसटी आणि अन्य करांचा खर्च वाढणार आहे,अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. मुंबईकरांना दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र गेल्या काही वर्षात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईची झळ पोहचू नये म्हणून समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प हाती घेण्याची योजना पालिका प्रशासनाने आखली आहे. या प्रकल्पाचा खर्च सुरुवातीला ३५०० कोटी रुपये इतका असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधी वाढीव खर्च होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
बोरीवलीतील मनोरी समुद्र किनार्यावर हा खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारला उभारला जाणार आहे.याठिकाणी दररोज ४०० दशलक्ष लीटर खार्या पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत ३५०० कोटी आहे. पण वाढत चाललेली महागाई, जीएस आणि इतर कर यामुळे या प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे.