मुंबई- राज्यातील सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याचे कंत्राट कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीतील कंपनीला देण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. येत्या काही दिवसांत याबाबतचे कार्यादेश निघण्याची शक्यता आहे.
वस्त्रोद्योग कंपन्या आणि राजकीय विरोधकांचा विरोध असतानाही राज्य सरकारने इचलकरंजीतील पद्मचंद मिलापचंद जैन यांच्या कंपनीला हे गणवेषाचे कंत्राट देण्याचा घाट रचला आहे. हे कंत्राट मिळविणाऱ्या सहा कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये इचलकरंजीच्या कंपनीने सरकारने जाहीर केलेल्या रकमेच्या दरांपेक्षा ११ कोटी रुपये कमी रकमेची निविदा भरली आहे. राज्यातील ४४ लाख विद्यार्थ्यांसाठी १.१९ कोटी मीटर कापड लागणार आहे. त्यासाठी पद्मचंद जैन यांच्या कंपनीने १२७ कोटी रूपयांची निविदा भरली आहे.ही कंपनी पुढील दोन महिन्यांत हा गणवेश सर्व तालुक्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून हा गणवेश खर्च केला जाणार आहे. हे गणवेश कापड एकाच कंपनीकडून घेऊन त्याचे काम महिला बचत गटांना दिले जाणार आहे.