सुरत
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तपासात मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा यश मिळाले. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच पथकाला गोळीबारात वापरलेले एक पिस्तूल सोमवारी सूरतमधील तापी नदीत सापडले होते. त्यानंतर आता नदीत फेकलेले दुसरे पिस्तूलही पोलिसांना सापडले आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहीम सुरू होती.
यासोबतच पोलिसांना जिवंत काडतुसे मिळाली आहेत. दोन्ही हल्लेखोरांनी पोलिसांना सांगितले होते की त्यांच्याकडे एक नाही तर दोन पिस्तूल होती. १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी दोन्ही पिस्तूल तापी नदीत फेकल्या होत्या. सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली होती. चौकशीदरम्यान या दोघांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.