सांगली
सांगलीच्या विजयपूर-गुहागर महामार्गावर वऱ्हाड्यांच्या बसला जीपने धडक दिल्याने अपघात झाला. काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वऱ्हाड्यांची बस लग्नसमारंभ उरकून परतत होती. या बसमधून १८ ते २० जण प्रवास करत होते. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप बसला धडकली, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात जीपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.