मुंबई
आजारपणाचे कारण सांगत अचानक सामूहिक रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एअर इंडियाने आज कारवाई केली आहे. कंपनीने ३० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. कंपनीच्या दैनंदिन कारभारात अडथळा आणल्याबद्दल आणि अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनामुळे एअर इंडियाच्या ७० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
एअर इंडियाच्या व्यवस्थापनाविरोधात कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले होते. व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हे सामूहिक रजा आंदोलन करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. एअर इंडियाने याबाबत आता कारवाई केली असून कंपनीने सामूहिक रजा घेतलेल्या ३० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. कंपनीने सांगितले की, मंगळवारी अनेक उड्डाणे होणार होती, तेव्हा शेवटच्या क्षणी केबिन क्रू सदस्यांनी आजारी असल्याचे सांगत सुट्टी घेतली आणि त्यांचे मोबाईल फोन बंद केले.त्यामुळे कामकाजात मोठान व्यत्यय आला. आम्हाला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. ज्यामुळे उड्डाणांचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले. याचा परिणाम सुमारे १५,००० प्रवाशांवर झाला. कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. याप्रकरणी आता ३० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून इतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याल सांगितले आहे.