सावंतवाडी- कोळी रोगामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील सुपारी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सुपारीची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे.तालुक्यातील कृषी अधिकार्यांनी रोगग्रस्त सुपारी पिकांचे पंचनामे पूर्ण केले असून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे,अशी माहिती तळकट तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामचंद्र सावंत यांनी दिली.
या संबंधित सुपारी बागायतदारांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तळकटचे रामचंद्र सावंत यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.या दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड केली आहे.मात्र या दोन्ही तालुक्यांत कोळी रोगामुळे सुपारीची गळती सुरू झाली आहे.निर्सगाच्या अनियमितपणाच्या व अकाली पावसाचा परिमाण होऊन बागायतदार खूपच अडचणीत आहेत. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे कीटकजन्य कोळी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे.यामुळे सुपारी बागायतदारांचे गळतीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी करण्याची विनंती करण्यात आली होती.दरम्यान, गेल्यावर्षी अशाच प्रकारचे पंचनामे करण्यात आले. मात्र,पंचनामे झाले तरी त्या बागायतदारांना नुकसानभरपाई मिळाली नव्हती.