सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नकाशातून काही गावांची नावे गायब झाली आहेत. तसेच किल्ल्यांची माहिती अपूर्ण स्वरुपात देण्यात आली आहे. यासंदर्भात जनसेवा प्रतिष्ठानचे डॉ. संजीव लिगवत यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा माहीती कार्यालयाचे संदीप राठोड यांचे लक्ष वेधले आहे.
डॉ. संजीव लिगवत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नकाशातील काही माहिती त्रोटक स्वरूपातील आहे. जिल्ह्यात तब्बल ३५ किल्ले असताना प्रत्यक्षात या किल्ल्यांची संख्या कमी दाखविण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास ७५० गावे असून काही गावांची नावे या नकाशातून गायब झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून २५ वर्षे उलटली आहेत. एवढ्यातच या जिल्ह्याच्या नकाशाची ही अवस्था झाली आहे ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.