नवी दिल्ली
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डाच्या (सीआयएससीई) इयत्ता दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
या वर्षी १० वी आणि १२ वी च्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी सीआयएससीई परीक्षा दिली होती. १० वीमध्ये ९९. ६५% मुली आणि ९९.३१% मुले उत्तीर्ण झाली. तर बारावीमध्ये ९८.९२% मुली आणि ९७.५३% मुले उत्तीर्ण झाली आहेत. विद्यार्थ्यांना पेपरची पुनर्तपासणी आणि पुनर्मुल्यांकनाची सुविधा देण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या पुनर्तपासणीसाठी १ हजार रुपये शुल्क आणि दहावी आणि बारावीच्या पुनर्मुल्यांकनासाठी १ हजार ५०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करायची असेल तर सीआयएससीईच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘पब्लिक सर्व्हिसेस’ या टॅबमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. हे अर्ज विद्यार्थ्यांना १० मे पर्यंत करता येणार आहेत, अशी माहिती बोर्डाने दिली आहे.