चंद्रपूर – राज्य शासनाने राज्यातील सोयाबीनच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने सोमवारी 9 जाहीर केला. या निर्णयामुळे चंद्रपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत असताना पडलेला पावसाचा खंड व अनियमित हवामान यामुळे जिल्हयात भात , सोयाबीन व कापूस या मुख्य पिकांवर किड व रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. कृषी विभागाने नियमितपणे पिकांचे किड व रोगांचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन वेळोवेळी शेतकऱ्यांना आवश्यक ते तांत्रीक मार्गदर्शन करुन किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या.
सोयाबीन पिकावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होवून पिक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्याचे वने,सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोना (खु) येथे तातडीने जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यानंतर यासंदर्भात मुनगंटीवार यांनी यंत्रणेला तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले व मंत्रालयात यासंदर्भात पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.