मुंबई – बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १६ डिसेंबर १९५६ रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात धम्म दिक्षा कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला होता,मात्र त्यापूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे अधुरा राहिलेला तो संकल्प पूर्ण करण्यासाठी काल १६ डिसेंम्बर रोजी धम्म परिषदेचे आयोजन केले होते.या धम्मपरिषदेत हजारो बौध्द अनुयायांच्या आणि बौद्ध उपासकांच्या साक्षीने जग भरातून आलेल्या बौद्ध प्रतिनिधी आणि बौद्ध भिक्खूंच्या उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘चलो बुद्ध की ओर’ चा नारा दिला.
यावेळी ‘पिढ्यानपिढ्या आम्ही मागत होतो दुसऱ्यांची भिक्षा ;आमच्या भीमाने दिली आम्हाला दिली बौद्ध धम्माची दिक्षा ; फुलून गेले आहे मैदान रेसकोर्स ; कारण या ठिकाणी पोहोचला आहे बौद्ध धर्मियांची फोर्स; आमच्याकडे तसा कसला नव्हता सोर्स तरी या ठिकाणी आला बौद्ध धर्मीयांचा फोर्स,अशी कविता सादर करुन आपल्या भाषणाला आठवले यांनी प्रारंभ केला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.जगात सर्वत्र बौद्ध धम्म प्रसारित झाला आहे.त्याबाबत आम्हाला अभिमान आहे. जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांची गरज आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दिक्षा देऊन नवजीवन दिले आहे. धम्म क्रांती घडविली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांची संकल्पना आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांचे वारसदार म्हणून आपण काम करीत राहू असा निर्धार आठवले यांनी व्यक्त केला.महालक्ष्मी रेसकोर्स वर आयोजित धम्म परिषदेत जाऊ नका असा एका बौद्ध संघटनेने विरोध केला,मात्र त्या विरोधाल न जुमानता हजारो लोक आज महालक्ष्मी रेसकोर्सवर पोहोचून रामदास आठवले यांच्या पुढाकारात आयोजित धम्म परिषदेत उपस्थित राहिले.
महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात सभास्थळी पोहोचण्यास ३ किमी अंतर अनुयायांना चालावे लागत होते. सभेच्या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था नव्हती तरी लोक जमिनीवर बसून धम्मपरिषदेत सहभागी झाले.यावेळी पूज्य भिक्खू संघाला आठवले त्यांचे पुत्र जित आठवले यांच्या हस्ते कठीण चिवरदान आणि धम्म दान करण्यात आले.यावेळी सौ सीमाताई आठवले उपस्थित होत्या. पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो,अविनाश कांबळे; पद्मश्री कल्पना सरोज आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.