भोपाळ
भोपाळच्या पिपलानी भागात राहणाऱ्या पतीने त्याच्या पत्नीला मधुचंद्रासाठी गोव्याला नेण्याचे वचन दिले होते. मात्र गोव्याऐवजी तो त्याच्या पत्नीला अयोध्येला घेऊन गेला. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने अयोध्येहून परतल्यानंतर १० दिवसांनी पतीपासून घटस्फोट मिळावा, अशी मागणी करत कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. गोव्याला जायचे सांगून अचानक अयोध्येला घेऊन जाणे, ही बाब विश्वासघात करण्यासारखी आहे, असा दावा पत्नीने केला आहे.
पिपलानी भागात राहणाऱ्या या जोडप्याचे ऑगस्ट २०२३ मध्ये लग्न झाले. पतीने त्याच्या पत्नीला मधुचंद्रासाठी गोव्याला नेण्याचे वचन दिले होते. मात्र तो त्याच्या पत्नीला अयोध्येला घेऊन गेला. भोपाळ कौटुंबिक न्यायालयाचे वकील शैल अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या जोडप्याचे समुपदेशन केले जात आहे. दोघांचे नाते टिकवण्यासाठी समोपदेशकांकडून प्रयत्न केला जात आहे.
याबाबत पत्नीने सांगितले की, ‘माझा नवरा आयटी क्षेत्रात काम करतो आणि त्याला चांगला पगार मिळतो. लग्नानंतर मधुचंद्राला गोव्याला घेऊन जाईन असे मला माझ्या पतीने वचन दिले होते. मात्र तो अयोध्येला घेऊन गेला. इतकेच नाही तर पतीने त्याच्या आईलाही आमच्याबरोबर घेतले. कारण त्याच्या आईला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येला जायचे होते. जेव्हा त्याने ही बाब मला सांगितली तेव्हा मी शांत राहिले मात्र मधुचंद्राहून परत आल्यावर दहा दिवसांनी घटस्फोटासाठी अर्ज केला.’