मुंबई
वाढत्या प्रवासी गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत दोन टप्प्यांत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचे प्राथमिक काम पूर्ण झाले असून मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू केल्या जातील. जून महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. दरम्यान, जागेच्या अनुपलब्धतेमुळे हार्बर मालाड स्थानक उन्नत असेल. मालाडच्या पुलासाठी साधारण १४५ कोटी रुपये आणि मालाड स्थानकासाठी अंदाजे ६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान २.६ किमीचा उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.
बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचे प्राथमिक काम पूर्ण झाले आहे. यामध्ये भू-तांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, बाधित बांधकामे व झाडांचे ड्रोन सर्वेक्षण यांचा समावेश आहे. गोरेगाव ते मालाड पहिला टप्पा २०२६-२७ आणि मालाड ते बोरिवली दुसरा टप्पा २०२७-२८पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. यासाठी ८२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. हार्बर विस्तारीकरण जलदगतीने पूर्ण करण्यासाठी गोरेगाव ते मालाड (२ किमी) आणि मालाड ते बोरिवली (६ किमी) असा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे.