प्रयागराज
हिंदू कायदा वैध विवाहासाठी ‘सप्तपदी’ आवश्यक गोष्टींपैकी एक असल्याचे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले. सर्व प्रथा आणि विधींसह पूर्ण झालेला विवाह सोहळाच कायद्याच्या दृष्टीने वैध विवाह मानला जाऊ शकतो. तसे नसेल तर असा विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध विवाह मानला जाणार नाही. वाराणशीच्या स्मृती सिंह उर्फ मौसमी सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी ही टिप्पणी केली.
उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याविरुद्ध २१ एप्रिल २०२२ रोजी जारी केलेले समन्स आणि तक्रार रद्द केली. घटस्फोट न घेता पुन्हा लग्न केल्याचा आरोप करत मौसमीचा पती आणि सासरकडील लोकांनी वाराणसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याचिकाकर्त्यानी सांगितले की, सत्यम सिंहसोबत ५ जून २०१७ रोजी मौसमीचा विवाह झाला होता. नात्यात कटुता आल्यानंतर तिने सत्यम आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सत्यम आणि कुटुंबाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर घटस्फोट न घेता मौसमीने दुसरे लग्न केल्याची तक्रार सत्यम आणि त्याच्या कुटुंबियांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. सीओ सदर मिर्झापूर यांनी या तक्रारीची चौकशी करून ती खोटी ठरवून अहवाल दिला. यानंतर सत्यमने वाराणसी जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली.