४०० हून अधिक उमेदवार असल्यास निवडणुका मतपत्रिकेवर

मुंबई- केंद्रीय निवडणुक आयोगाने देशातील लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, एका मतदारसंघात मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरल्यास निवडणुका ईव्हीएम मशीनवर होणार की मतपत्रिकेवर, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत खुलासा करताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी अशी माहिती दिली की, एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील.
१९ एप्रिल ते २० मे या कालावधीत महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यांत मतदान होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजातील तरुणांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर मराठा समाजाच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेण्यात अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. याबाबत चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषेदत माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील. कारण सध्याच्या स्थितीत ईव्हीएम मशीनची तांत्रिक क्षमता ४०० उमेदवारांपर्यंतची आहे. यापेक्षा जास्त उमेदवारांची ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेतल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी मतपत्रिकांवर निवडणूक घेणे अधिक सोयीस्कर ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top