अमरावती- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाची जोरदार रस्सीखेच सुरु असताना महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू नाराज झाले आहेत. जागावाटपाबाबत महायुती प्रहार संघटनेला विचारात घेत नाही. लोकसभा निवडणुकीबाबत 11 एप्रिलला अंतिम निर्णय घेणार असल्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.
जागावाटपात अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. मात्र. या बैठकीत महायुतीने प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू सहभागी केले नाही. त्यामुळे बच्चू कडू नाराज झाले आहेत. बच्चू कडू म्हणाले की, ”विदर्भातील सर्व जिल्ह्यांत बैठका घेणार आहे. सर्वसामान्य गोरगरीब शेतमजूर, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला जाईल. त्यानंतर लोकसभा निवडणुकीबाबत 11 एप्रिल रोजी अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. पक्षाची व्यवस्थित बांधणी केली, योग्य प्लॅनिंग केले तर पश्चिम विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघातून प्रहारचा खासदार निश्चित निवडून येईल.” त्यामुळे आता येत्या ११ एप्रिल रोजी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून वेगळी चूल मांडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.