तोतापुरी आंब्यांवरुन आंध्रप्रदेश व कर्नाटकात संघर्ष


बंगळुरु – तोतापुरी आंब्यांवरुन काँग्रेसशासित कर्नाटक (Karnataka )व आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh)संघर्ष निर्माण झाला आहे. आंध्र प्रदेशातील चिंतुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी इतर राज्यांमधून येणाऱ्या तोतापुरी आंब्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
तोतापुरी आंब्यांवर (Totapuri mangoes)बंदी घालण्याच्या या निर्णयाचा मोठा फटका कर्नाटकातील तोतापुरी आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसला असून कर्नाटकचे प्रधान सचिव शालिनी रजनीश यांनी १० जून रोजी आंध्र प्रदेशच्या प्रधान सचिवांना व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ११ जून रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पत्र लिहून ही बंदी उठवण्याची मागणी केली. या बंदीमुळे कर्नाटकातील तोतापुरी आंबाबागायतदारांना मोठा फटका बसू शकतो असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तोतापुरी आंब्यांना बंगळूरू किंवा संदेरशा अशा नावाने ओळखले जाते. या आंब्यांचे उत्पादन आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तोतापुरी त्यांच्या वेगळ्या आकारासाठी व त्याच्या गरामुळे आंब्याच्या रसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. आंध्र प्रदेशातील चिंतुर येथे आंब्यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आहेत. कर्नाटकातून येणारा आंबा तुलनेने स्वस्त असल्यामुळे हा आंबा खरेदी करण्याकडे प्रक्रिया उद्योगाचा कल असतो. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. आंध्र प्रदेश दर वर्षी तोतापुरी आंब्यांचे दर ठरवत असते. आंध्र प्रदेशात तब्बल साडेपाच लाख टन आंब्यांवर प्रक्रिया केली जाते. दोन्ही राज्यातील दरांमधील तफावतीमुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे.