Former SC judge Katju announces new ‘Ishq Karo Party’ against CJP – देशाच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर आपल्या तिरकस बोलण्याबद्दल ओळखले जाणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी ‘इश्क करो पार्टी’ या नावाने नव्या संघटनेची घोषणा केली आहे. कॉकरोच जनता पार्टी गाजत असतानाच हा नवा टाईमपास राजकारणात उतरला आहे. तरुणांनी या पक्षाशी जोडावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘मेक लव्ह, नॉट वॉर’ अर्थात ‘प्रेम करा, भांडू नका’, हा या पक्षाचा मुख्य संदेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या विरोधात ही पार्टी स्थापन करून युवकांचे लक्ष खेचण्याचा हा डाव असल्याचे म्हटले जाते आहे.
काटजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून इच्छुकांना ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन केले. आपण या पक्षाचे संरक्षक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते द्वेष, संघर्ष आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाला पर्याय म्हणून प्रेम, बंधुभाव आणि मानवी नातेसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पक्ष स्थापन करण्यात आला आहे. पक्षाचा अधिकृत जाहीरनामा मात्र अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. अलीकडेच या संघटनेने कथित काटजू यांनी एक्सवरील आणखी एका पोस्टमध्ये भारतीय तरुणांना उद्देशून म्हटले आहे की, कॉकरोचविषयीच्या निरर्थक चर्चा विसरा आणि ‘इश्क करो पार्टी’त सामील व्हा.
सध्या ‘इश्क करो पार्टी’ ची उपस्थिती प्रामुख्याने सोशल मीडिया आणि ऑनलाईन चर्चांपुरतीच मर्यादित दिसत आहे. पक्षाची संघटनात्मक रचना, पदाधिकारी किंवा निवडणूक लढवण्याची रणनीती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, पक्षाची वेबसाईट आणि सोशल मीडिया खाते तयार करण्याचे काम सुरू असल्याचे संकेत काटजू यांनी दिले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी ज्येष्ठ लेखिका व पत्रकार मृणाल पांडे यांनाही पक्षात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
त्यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर मीम्स आणि प्रतिक्रियांचा पूर आला. काटजू यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी सध्याच्या तणावपूर्ण राजकीय वातावरणात हा सकारात्मक आणि हलकाफुलका संदेश असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हा पक्ष प्रत्यक्ष राजकारणात उतरणार की, केवळ सोशल मीडियापुरताच राहणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. काहींनी विनोदी शैलीत ‘एकतर्फी प्रेम करणार्यांनाही सदस्यत्व मिळेल का?’ अशी विचारणा केली, तर अनेकांनी पक्षाचा जाहीरनामा जाहीर करण्याची मागणी केली.
मार्कंडेय काटजू हे भारताच्यासर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ते सप्टेंबर 2011 मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. अनेकदा वादग्रस्त विधानांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील एस. एन. काटजू हे अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश होते.
