Majhi Shala Scheme Shutdown? – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात सुरु झालेली मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजना बंद होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आनंदाचा शिधा योजनेनंतर शिंदेंची अजून एक योजना बंद होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून उबाठा नेते अंबादास दानवे यांनी योजना बंद करणारे हे चालू सरकार असल्याची टीका केली आहे.
राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास, आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही योजना ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झाली होती. ती केवळ वर्षभरच राबवण्यात आली. २०२५चा ऑक्टोबर महिना संपत आला तरी या योजनेबाबत सरकारने कोणतीही घोषणा किंवा निर्णय घेतलेला नाही.
याबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाचा हा विषय आहे. याबाबत मला कल्पना नाही. परंतु सरकार चालवत असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विचारविनिमय करून सरकार चालवतात. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही अशी ठाम भूमिका सरकारची आहे.
उबाठा नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर लिहिले की,सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले कटप्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना दिसतात.
आतापर्यंत शिंदेंच्या आनंदाचा शिधा,माझी सुंदर शाळा, १ रुपयात पीकविमा,स्वच्छता मॉनिटर,१ राज्य १ गणवेश,लाडक्या भावाला अपरेंटीसशिप, योजनादूत योजना,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजना बंद झाल्या आहेत.योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू.
हे देखील वाचा –
मतचोरीच्या एसआयटी चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
काँग्रेसला सोबत घेण्यास राज ठाकरेच इच्छूक! राऊत यांचे वक्तव्य
डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा घुमजाव क्षी जिनपिंग यांची प्रशंसा केली