Parsi Community Urges PM to Save CBI – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वदेशीच्या ध्येयानुसार स्थापन करण्यात आलेल्या पारशी समुदायाच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अस्तित्व व महत्त्व कायम ठेवावे अशी मागणी देशातील पारशी समाजाने पंतप्रधानांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
पारशी समुदायाच्या पुढाकाराने २१ डिसेंबर १९११ साली स्थापन झालेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेचे मोठ्या बँकेतील विलनीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना सर सोराबजी पोचखानवाला व स्वातंत्र्यसैनिक फिरोजशहा मेहता यांच्या पुढाकाराने पारशी समुदायाने केली होती. त्या काळातील भारतीयांनी स्थापन केलेली व चालवलेली ही बँक होती. टाटा कंपनीप्रमाणे त्यावेळची ती एक महत्त्वाची पारशी संस्था होती.
इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात १९६९ साली सर्व खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आल्यानंतर ही बँक सरकारच्या ताब्यात आली. आता मोदी सरकारने सर्व लहान बँकांचे विलीनीकरण करुन एकच मोठी बँक स्थापन करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार या बँकेचे विलीनीकरण होणार आहे.
या संदर्भात नुकतीच सुरत पारसी पंचायत फंड या समुदायाच्या सर्वोच्च संघटनेने या बँकेच्या विलिनीकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. या संघटनेचे अध्यक्ष डॉ. होमी दुधवाला यांनी म्हटले की, या बँकेचे विलिनीकरण जरी करण्यात आले तरी त्याची भारताची पहिली स्वदेशी बँक ही ओळख कायम ठेवावी.
मुंबईच्या पारशी संघटनेचे अध्यक्ष झेरक्सेस दस्तुर यांनी म्हटले की, बँक अनेक वर्षांपासून स्वतःच्या पायावर उभी आहे. आम्ही ही बँक वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही बँक टाटांशीही संबंधित आहे. या बँकेचे पारशी समुदायात फार महत्त्व असून पारशांच्या अनेक पिढ्यांनी इथे काम केले आहे . जवळजवळ सर्वांचीची खाती या बँकेत आहेत. या बँकेने समाजाच्या प्रगतीत मोठा वाटा उचललेला आहे. त्यामुळे या बँकेची ओळख कायम ठेवण्यात यावी.
हे देखील वाचा –
भारताचा स्वदेशी मेसेजिंग ॲप आराटाई; व्हॉट्सॲपला टक्कर देणारा नवा पर्याय
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत ! 6, 11 नोव्हेंबरला मतदान! 14 ला निकाल