Sharad Pawar – Black Diwali for Farmers – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाने शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे वक्तव्य जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज सरकारवर निशाणा साधताना केले. दिवाळीनंतर आपण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार आज बारामतीत पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पूर झाला. काही ठिकाणी महापूर होता. यात शेती उद्धवस्त झाली.
शेती नुसती उद्धवस्त झाली नाही, तर पीक ज्या जमिनीत यायचे ती जमीनच खरडून गेली. त्यामुळे सर्व शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्या दृष्टीने शेतीची जमीन हे त्याचे सर्वस्व आहे. संकटे येतात पण अशावेळी ज्यांच्या हाताता देशाची, राज्याची सत्ता आहे, त्यांची संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हाताभार लावायची जबाबदारी असते.
आता राज्य सरकारने काही तोकडी रक्कम जाहीर केली. पण नुकसानीचे स्वरुप बघितल्यावर या तोकड्या रक्केमेचा उपयोग त्याला पुन्हा उभे करण्यासाठी होईल असे वाटत नाही.त्यामुळे राज्य सरकारवर संकटग्रस्त शेतकरी नाराज आहे. माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे.
इथे मी राजकारण आणू इच्छित नाही. पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. सढळ हाताने मदत करण्याची तयारी आतापर्यंत दिसत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाने राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा –
गोमांस विक्रीवरून दोन गटात राडा; अकोल्यात तणावाचे वातावरण..
Gopichand Padalkar : पडळकरांच आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य; हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये..