11th admission process १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई – अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत काल गुरूवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातून १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.त्यापैकी ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून अर्ज निश्चित केला.त्यामुळे राज्यातील १ लाख ४१ हजार ३७१ विद्यार्थी पहिल्या फेरीसाठी मुकणार आहेत. यामध्ये मुंबईतील सर्वाधिक ३५ हजार ३०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली.यामध्ये १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क ऑनलाईन जमा केले.त्यातील १२ लाख ५ हजार १६२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला.तर ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून अर्ज निश्चित केला आहे.यामध्ये इनहाऊस कोट्यासाठी ६४ हजार २३८, व्यवस्थापन कोट्यासाठी ३२ हजार ७२१ व अल्पसंख्याक कोट्यासाठी ४७ हजार ५७८ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल आहेत. मुंबई विभागात सर्वाधिक ३५ हजार ३०३ विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या नियमित फेरीपासून वंचित राहणार आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरमध्ये सर्वाधिक १४ हजार १७५ विद्यार्थी पहिल्या नियमित फेरीपासून वंचित राहतील. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात १२ हजार ७८९ विद्यार्थी, पालघरमध्ये ५ हजार ५८७ विद्यार्थी आणि रायगडच्या २ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरलेला नाही. गुणवत्ता फेरी १० जून रोजी जाहीर होणार आहे.