नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी! जयंत पाटलांचे वक्तव्य

पुणे – नवीन लोकांना संधी द्या, असे सांगत शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या घोषणेनंतर सभागृहात काहीसा गोंधळ निर्माण झाला. अनेक कार्यकर्त्यांनी ‘नाही’ म्हणत त्यांच्या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की , पवार यांनी मला भरपूर संधी दिल्या. सात वर्षे मला जबाबदारी दिली. आता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आवश्यकटा आहे. सर्वांसमोरच मी त्यांना विनंती करतो की नवीन लोकांना संधी द्यावी. शेवटी हा पक्ष पवार साहेबांचा आहे आणि त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा.
ते पुढे म्हणाले, भाजपाचे कधी काळी केवळ दोन खासदार होते, आज तो देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे घाबरायचे कारण नाही. आपण सर्वांनी ताकदीने काम केले, तर राज्यात पुन्हा विजय मिळवू शकतो. ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम यांच्यातली आहे, आणि आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत. पराभवाची चर्चा करू नका, कारण रणात झुंजणारे अजूनही शिल्लक आहेत.