मुंबई – शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या प्रश्नावर बोलताना उबाठाचे संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत.
ते पुढे म्हणाले की मराठी माणसाच्या हिताचा विचार घेऊन राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभे केले आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा विचार करणाऱ्या सर्वांनीच आता एकत्र आले पाहिजे. अन्यथा मुंबई आपल्या हातात राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशासह महाराष्ट्रात अराजक माजवले आहे. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचे, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे षडयंत्र त्यांनी रचले आहे. त्यांच्यापासून मुंबई आणि महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे.आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व नेते राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत एका सुरात बोलत आहोत. त्यावर कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. आमच्या भावना निर्मळ,स्वच्छ आणि स्पष्ट आहेत. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत,असे राऊत म्हणाले.
मात्र मनसेने यात फारसा उत्साह दाखवला नाही . मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले की २०१४, २०१७ या वर्षी राज ठाकरे यांनी त्यांना फोन केला होता . करोना काळात आपण जनतेसाठी कार्य केले पाहिजे असे फोन करून सांगितले होते. आता त्यांनी फोन करायला हवा . एकत्र यायचे का हे दोघा भावांनी एकमेकांशी बोलून ठरवायला हवे.
