नवी दिल्ली – आणीबाणी लादणाऱ्यांनी केवळ संविधानाची हत्या केली नाही, तर न्यायपालिका गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला, या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी आज केला. त्यांनी मन की बात (Mann ki Baat)या रेडिओ कार्यक्रमाच्या १२३व्या भागात देशवासीयांशी संवाद साधताना आणीबाणीच्या काळाचा (Emergency period)पुनश्च उच्चार केला.
पंतप्रधान म्हणाले की, देशावर आणीबाणी लादण्यात येऊन आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण ती आठवण संविधान हत्या दिवस म्हणून लक्षात ठेवली पाहिजे. त्या काळात हजारो लोकांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले. या काळात जॉर्ज फर्नांडिस यांना साखळदंड बांधण्यात आले होते. अनेकांना कठोर यातना सहन कराव्या लागल्या. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कुणालाही अटक केली जात होती. अगदी विद्यार्थ्यांनाही त्रास दिला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली होती. पण भारतातील जनता वाकली नाही, तुटली नाही. लोकशाहीसोबत तिने कोणताही तडजोड स्वीकारला नाही. शेवटी जनतेचा विजय झाला, आणीबाणी हटवण्यात आली आणि ती लादणाऱ्यांचा पराभव झाला.
मोदी पुढे म्हणाले की, अलीकडेच एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की देशातील ९५ कोटी नागरिक कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. ही गोष्ट भारताच्या सामर्थ्यावरचा विश्वास अधिक दृढ करते. देश आता जनसहभागातून पुढे जात आहे