Tejashwi Yadav VS Indian National Congress : काँग्रेसप्रणित महागठबंधने बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर तर केले पण, तरीही यातून विरोधकांमधील मतभेद काही लपून राहिलेले नाहीत. बिहारमधील महागठबंधन किंवा इंडिया आघाडीच्या लाजेखातर नाईलाजास्तव का होईना, काँग्रेसला तेजस्वी यादव यांच्या नावावर संमती दर्शवावी लागलीच.
आता बिहारमध्ये पुन्हा ‘काननराज’ हवे की ‘विकासराज’ याचा निर्णय बिहारच्या जनतेनेच मतपेटीतून घ्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासारख्या मोठ्या दिग्ग्जव्यक्तीना तेजस्वी यादव यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत घाम फोडला होता. त्यादिवसापासून त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला कमी लेखण्याची भूल चूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कधीही केलेली नाही. कुठल्याही राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या भूमिकेत असलेल्या मित्रपक्षाचे नेतृत्व मान्य करायचे नाही आणि शेवटचा अर्ज भरेपर्यंत जागावाटपावरुन सतत मतभेद करत मित्रपक्षांचा छळ करायचा, या किचाट मानसिकतेतून काँग्रेसच्या स्थानिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाला बाहेर पडणे शक्य होत नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यात संभाषण कमी असून, बिहारमध्ये जनतेसमोर भाजपच्या रालोआला सुसंगत पर्याय देण्याऐवजी, काँग्रेस आणि राजद या दोन्ही पक्षांनी आपल्या हिश्यात कशा जास्त जागा येतील,हाच स्वार्थी विचार अखेरच्या क्षणापर्यंत करत राहिले. म्हणूनच फक्त एकूण २४३ जागांसाठीच्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ‘महागठबंधन’कडून तब्बल २५३ उमेदवार रिंगणात आहेत.

त्यामुळे महागठबंधनच्या नावाखाली ‘राजद विरुद्ध काँग्रेस’, ‘राजद विरुद्ध भाकप’ अशा लढती काही मतदारसंघांमध्ये रंगणार आहेत. मागच्या काळात राहुल आणि तेजस्वी यांनी बिहारमध्ये यात्रा काढत नसलेल्या एकतेचेही तोंडदेखले दर्शन घडवून आणले होते. मात्र, ही एकतेची यात्रा केवळ फोटो समारंभापुरतीच मर्यादित होती का?. कारण, तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करतानाच्या पत्रकार परिषदेत राहुल यांची गैरहजेरी, हे या ढोंगी एकतेचे दर्शन म्हणावे लागेल. राहुल गांधी यांचे नेतृत्वही या बाबतीत इतर काँग्रेसजनांप्रमाणेच प्रतिबंधित आहे, असे म्हणावे लागेल. त्याचा प्रत्यय देखील बिहारच्या निवडणुकीत वारंवार येतो आणि यंदाची निवडणूक देखील त्याला अपवाद नाही.
बिहारमध्ये काँग्रेसकडे म्हणावा तसा ठोस जनाधार असलेला एकही चेहरा नाही. गेल्या तीन दशकांपासून सातत्याने कृश होत गेलेल्या पक्षसंघटनेत जीव ओतणे राहुल गांधी यांना कदाचित जमले नसावे. मागच्या विधानसभा निवडणुकीत सामर्थ्य नसताना जागावाटपात एकूण ७० जागा मिळविणारा हाच काँग्रेस पक्ष तेजस्वी यादव यांच्या हातात आलेली सत्ता घालविण्यात कारणीभूत ठरला अशी सामान्य जनतेची धोरण आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी राहुल गांधी मात्र बिहारविषयी सक्रिय झाले नव्हते.
पक्षाच्या सगळ्यात बड्या नेत्याने ऐन मोक्याच्या वेळी पाठ फिरविल्याचे बघून राज्यातील दुय्यम काँग्रेस नेते नेहमीप्रमाणे महागठबंधन कमकुवत करण्यात व्यग्र झाले. पुढे ‘व्होटर अधिकार यात्रे’ दरम्यान तेजस्वी यादव महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला असता त्यांनी हा प्रश्न टाळला. इतर वेळी सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरे देणारे राहुल गांधींनी हा प्रश्न टाळ्यामुळे अनेक चर्चाना उधाण आले. राज्यातील काँग्रेसचे नेते निवडणुकीच्या काळात ईर्षेने पेटून उठत स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडल्याशिवाय राहात नाहीत, तिथे मित्रपक्षांचे काय घेऊन बसणार असे ताशेरे देखील आता काँग्रेस वर उठत आहे.
तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्यावर एकमत होण्यासाठी यामागील चर्चा किंवा मतभेत लोकांपासून लपून राहिले नाहीत. गेहलोत यांनी पाटण्यातील पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा तर केली पण, त्यावेळी पृष्ठभूमीवर लावलेल्या पोस्टरवर राहुल गांधी यांचा चेहरा मात्र न्हवता. ही घोषणा झाली तेव्हा राहुल गांधी देखील तिथे उपस्थित न्हवते त्यामुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध हि घोषणा करावी लागली असावी का? असा अर्थ त्यातून निघत आहे.
हे देखील वाचा –Stranger Things Finale: स्ट्रेंजर थिंग्जच्या चाहत्यांना बम्पर ‘ट्रीट’; शेवटचा एपिसोड थिएटरमध्ये होणार प्रदर्शित









