गुवाहाटी- आसाम सरकारने कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला धेमाजी आणि जोरहाट या दोन जिल्ह्यांत रात्रीचा मुक्काम करण्यास परवानगी दिली नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि आसामचे विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी केला.
देबब्रत सैकिया यांनी एका जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले की,आसाम सरकारने मनाई केल्यामुळे काँग्रेस पक्ष आता यात्रेदरम्यान रात्रीच्या विश्रांतीसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करत आहे.यासाठी खासगी मालमत्तेमध्ये रात्रीच्या विश्रांतीची व्यवस्था करण्याचा विचार केला जात आहे. जिथे राहुल गांधी आणि पक्षाचे इतर नेते रात्रीची विश्रांती घेऊ शकतील.खरे तर भाजप आमच्या लोकशाही अधिकारांचे उल्लंघन करत आहे.आम्ही धेमाजी जिल्ह्यातील गोगामुख येथील शाळेच्या मैदानावर रात्री विश्रांतीसाठी कंटेनर वाहने पार्क करण्याची परवानगी मागितली होती. सुरुवातीला परवानगी देण्यात आली, मात्र अखेरच्या क्षणी ही मान्यता काढून घेण्यात आली. त्याचप्रमाणे जोरहाटमधील एका महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रात्रीच्या विश्रांतीची मागणी करण्यात आली होती, मात्र तेथेही सरकारने परवानगी दिली नाही.आमची यात्रा हा काही राजकीय कार्यक्रम नाही. भाजपा आमच्या मोर्चा काढण्याच्या लोकशाही अधिकाराचे उल्लंघन करत आहे.आता आम्ही काही नागरिक आणि खाजगी कंपन्यांची मदत घेत आहोत जेणेकरून आम्हाला त्यांची जागा रात्रीच्या विश्रांतीसाठी वापरता येईल.खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही यात्रा १४ जानेवारीला इम्फाळ येथून सुरू होऊन २० मार्चला मुंबईत संपणार आहे.