नागपूर- भाजपा स्वतःचाच विचार करणारा पक्ष असून काँग्रेस जनतेचा विचार करणारा पक्ष आहे. इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मान्य करणारे सरकार आम्ही या आधी कधी पाहिले नाही. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ते आज नागपूरात २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी इतर अनेक विषयांवरही भाष्य केले. काँग्रेस पक्षाच्या या महारॅलीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह सोनिया गांधी, राहूल आणि प्रियांका उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मेळावा स्थळाला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ असे घोषवाक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष देशाचा विचार करतो तर भाजपा केवळ स्वतःचाच विचार करतो. अर्थसंकल्पाच्या रकमेएवढ्या पुरवणी मागण्या मांडणारे सरकार आम्ही पाहिले नाही. असेही त्यांनी सांगितले. मागच्या अधिवेशनात ९६ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य झाल्या आहेत. पुरवणी मागण्यांसाठी अधिवेशन घेणे ही संवैधानिक व्यवस्था असल्याकारणानेच ते अधिवेशन घेतात की काय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या अधिवेशनात आम्ही ज्या ज्या विषयांवर चर्चेची मागणी करायचो त्यावरच तेही चर्चेची मागणी करतात. आम्ही जर विदर्भाविषयी चर्चा करण्याची मागणी केली नाही असे जर विरोधकांचे म्हणणे आहे. तर त्यांनी या प्रश्नाबाबत चर्चा का केली नाही. त्यांच्याकडे पाशवी बहूमत आहे. मात्र आमच्या बरोबर आलेले लोक हे विचारधारेने व लोकशाहीसाठी एकत्र आले आहेत.
विरोधकांच्या नेतृत्वाचाही सन्मान करणे ही लोकशाही आहे. इंडिया आघाडीच्या नेतृत्वाचा निर्णय सगळेजण मिळून घेतील. सोनिया गांधींना याआधी दोन वेळा पंतप्रधानपदाची संधी आली होती मात्र देशाचा विचार करुन विरोधी मतांचा विचार करुन त्यांनी ती घेतली नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेसचा जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा आहे. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर आरक्षण देऊन मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणले पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपाला जर जनभावनेची इतकी कदर असेल तर त्यांनी जनभावनेचा आदर करुन मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याचा विचार करावा असेही ते म्हणाले. तूम्ही जर आमच्या नेतृत्वाचा आदर केला नाही तर आम्हीही तूमच्या नेतृत्वाला मानणार नाही. असेही त्यांनी सांगितले.