मुंबई, ठाणे, पुण्यात मुसळधार पाऊस! लोकल सेवा विस्कळीत

मुंबई – राज्यात यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावल्याने सुरुवातीला आनंदाचे वातावरण होते. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिक पुन्हा चिंतेत होते. आता चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. आज मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण, सांगलीसह राज्यातील अनेक भागांत आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन समजणाऱ्या लोकलसेवेवर झाला.

मुंबई आणि उपनगरात आज दिवसभर मुसळधार पावसाचा जोर कायम होता. सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, चेंबूर, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, अंधेरी, दादर आदी भागांत पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अचानक झालेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसाचा सर्वाधिक फटका लोकल सेवेवर बसला. मध्य रेल्वेच्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. हार्बर मार्गावरील लोकल सेवा देखील विस्कळीत झाली. काही लोकल १० मिनिटे उशिराने धावत होत्या. कल्याण ते सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळी ६.५५ वाजता सीएसएमटीकडे जाणारी एक लोकल ५ ते १० मिनिटांसाठी थांबलेली होती. मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासूनच पावसाचा जोर सुरू असल्याने तांत्रिक कारणास्तव ही गाड्या उशिरा धावत असल्याचे सांगितले जात आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतही सकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. खारघर, वाशी, बेलापूर या भागांमध्ये जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामादरम्यान ही घटना घडली. अअवघ्या अर्धा तासात झालेल्या पावसामुळे ही भिंत कोसळली.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि आजूबाजूच्या भागांमध्ये देखील विश्रांतीनंतर पावसाने पुनरागमन केले. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून शहरात पावसाच्या सरी सुरु झाल्या. अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. सांगली जिल्ह्यातही गेल्या पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आज सकाळपासून पुन्हा पडू लागला आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून पावसाच्या सरी सुरु झाल्या. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. अनेक भागांमध्ये पेरण्या सुरू झाल्या आहेत, तर काही भागांत त्या पूर्ण झाल्यामुळे शेतकरी या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.