*मंत्री केसरकरांचे पालिका
शिक्षण विभागाला निर्देश
मुंबई – निसर्ग,पर्यावरण आणि पर्यावरणातील घटक जवळून पाहता यावेत म्हणून मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दर आठवड्याला राणी बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सहलीसाठी न्यावे, असे निर्देश मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण विभागाला दिले.
राज्यातील वन्यजीव सप्ताह-२०२३ अंतर्गत भायखळा येथील पालिकेच्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात मंत्री केसरकर हे बोलत होते. हा कार्यक्रम पालिका शिक्षण विभाग आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री केसरकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना बेस्ट बसेसच्या माध्यमातुन दर शनिवारी आणि रविवारी राणी बागेत सहलीसाठी नेण्याचे नियोजन पालिका शाळांनी केले पाहिजे. प्राणी आणि मनुष्य यांच्यात एक नाते असते. वाढत्या शहरीकरणात हे नाते आपण टिकवले पाहिजे. यात उद्याने आणि बगीचे यांचा मोठा वाटा आहे.विद्यार्थ्यांना प्राणी आणि पक्षी नीट पाहता यावेत लवकरच डबल डेकर बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘मुंबई फर्स्ट’ सारखी स्वयंसेवी संस्था टेरेस गार्डन या संकल्पनेवर मोठे काम करत आहे.