महाराष्ट्र अदानींना गहाण दिली आहे का ? विजय वडेट्टीवारांचा सवाल

चंद्रपूर – महायुती सरकारने महाराष्ट्र आणि मुंबई अदानी समूहाला गहाण दिला आहे का , असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला उद्देशून केला.
मुंबईच्या कुर्ला येथील २१ एकर जागा अदानी उद्योग समूहाला राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला . त्यासाठी अटी – शर्ती देखील शिथिल केल्या आहेत. याआधी मुंबईतील अनेक महत्त्वाचे भूखंड सरकारने अदानीच्या घशात घातले आहेत. आणकी किती जमीन आहात देणार आहात, सरकारने महाराष्ट्र आणि मुंबई अदानी समूहाला गहाण ठेवली आहे का,असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
धारावी प्रकल्पासाठी अदानी समूहाला मुंबईतील जमिन खैरातीसारखी वाटण्यात येत आहे. धारावी पुनर्वसनाचे नाव पुढे करून मोक्याच्या जागा या उद्योग समूहाला देण्याचे काम सरकार करत आहे. या मोक्याच्या ठिकाणी टॉवर उभे केले जाणार पण धारावीकरांसाठी जमीन दिल्याचे सरकार खोटे सांगत आहे. हे सरकार अदानी उद्योग समूहासाठी महाराष्ट्राला उध्वस्त करत आहे,असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.