Ahilyanagar News: अहिल्यानगर शहरात रोजी धार्मिक तणावामुळे राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुर्गादौडच्या निमित्ताने माळीवाडा भागातील रस्त्यावर मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची आक्षेपार्ह रांगोळी काढून तिची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेवरून दोन गट समोरासमोर आले.
यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना दोनदा लाठीचार्ज करावा लागला होता. या घटनेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी षडयंत्र ्सल्याचा संशय व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहे.
नेमकी घटना आणि पोलिसांची कारवाई
नवरात्रानिमित्त आयोजित दुर्गादौड शहराच्या मध्यवर्ती माळीवाडा भागातून जाणार होती. या दौडीच्या स्वागतासाठी काढण्यात आलेली रांगोळी आक्षेपार्ह असल्याची तक्रार काही जमावाने केली. यानंतर माळीवाडा भागात मोठा जमाव जमला आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कोतवाली पोलिसांनी तातडीने रांगोळी काढणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. मात्र, याचवेळी दोन्ही बाजूचे जमाव पोलीस ठाण्यासमोर एकत्र आले आणि घोषणाबाजी करू लागले.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पहिल्यांदा लाठीचार्ज केला. या कारवाईच्या निषेधार्थ एका गटाचा जमाव कोठला भागात छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर जमा झाला आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलन बराच काळ चालल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि त्यानंतर दगडफेक सुरू झाली.
दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले. अखेर, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पुन्हा लाठीचार्ज करावा लागला आणि काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली. या संपूर्ण घटनेमुळे शहरात अनेक ठिकाणी अफवा पसरल्या होत्या आणि बाजारपेठा बंद होत्या. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 22 जणांना ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘षडयंत्रा’चा संशय
या संवेदनशील घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ही घटना जाणूनबुजून घडवून आणल्याचा आणि यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या घटनेची संपूर्ण माहिती माझ्याकडे अद्याप आलेली नाही, पण मला असं वाटतं की, अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा प्रकारचे वेगवेगळे बोर्ड लावून येथील सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. मुंबई, वसईसह काही ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर किंवा कृती झाल्याचे दिसून आले आहे. ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीपूर्वी काही प्रयत्न करण्यात आले, त्याच धर्तीवर समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, याकडे लक्ष द्यावे लागेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, याच्या पाठिमागे कोण आहे, याचा शोध घेऊन आम्ही निश्चित कारवाई करू. लोकांमध्ये जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर ते योग्य नाही, अशी चेतावणी देखील त्यांनी दिली.
हे देखील वाचा –