Ashok Kharat and Rupali Chakankar : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडत असताना, आता या प्रकरणाचा तपास थेट ‘शिवनिका संस्थान’च्या विश्वस्त मंडळापर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी खरातचे निकटवर्तीय कर्मचारी आणि मंदिरातील पुजाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र, आता पोलीस आणि तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी संस्थानच्या विश्वस्तांनाही चौकशीच्या फेऱ्यात ओढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
विश्वस्त मंडळाची पुनर्रचना आणि खरातचा प्रभाव-
अधिकच्या माहितीनुसार, अशोक खरात हा स्वतः या ‘शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होता. काही वर्षांपूर्वी या संस्थानच्या जुन्या विश्वस्तांनी खरातची साथ सोडल्यानंतर, त्याने अत्यंत धूर्तपणे नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना केली होती. या नवीन मंडळात त्याने आपल्या पत्नीचा समावेश करून कौटुंबिक वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, या विश्वस्त मंडळातील इतर सदस्यांच्या नावांवरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रुपाली चाकणकर यांच्या चौकशीची चर्चा-
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी मुद्दा म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील एका विशिष्ट कालखंडात या शिवनिका संस्थानच्या विश्वस्त मंडळावर कार्यरत होत्या. खरातच्या या वादग्रस्त संस्थानशी त्यांचे नाव जोडले गेल्याने, आता पोलीस त्यांचीही चौकशी करणार का? या प्रश्नाने जोर धरला आहे. जर विश्वस्त म्हणून त्यांचा या संस्थेच्या धोरणात्मक निर्णयात सहभाग असेल, तर तपास यंत्रणांना त्यांनाही जबाब नोंदवण्यासाठी पाचारण करावे लागू शकते. यामुळे या प्रकरणाला आता राजकीय परिमाण लाभले आहे.
तपासाची वाढती व्याप्ती-
अशोक खरातने भोंदूगिरीच्या जोरावर जमवलेली मालमत्ता, संस्थेचा आर्थिक व्यवहार आणि त्यामागे असलेले प्रभावशाली लोकांचे वरदहस्त या सर्वांचा शोध आता पोलीस घेत आहेत. संस्थानच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांची माहिती विश्वस्तांना होती का, की त्यांची नावे केवळ प्रतिमेसाठी वापरली गेली, याचा शोध घेणे आता अनिवार्य झाले आहे.
अशोक खरात प्रकरण: पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा संशय; रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा-
नाशिक येथील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर ‘शिवनिका संस्थान’मधील धक्कादायक वास्तव एकामागून एक समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली असून, संस्थानमधील संशयास्पद हालचालींमुळे तपासाचा फास अधिकच घट्ट झाला आहे. खरातच्या अटकेनंतर संस्थानच्या आवारातील विश्वस्त मंडळाचा माहिती फलक अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे पुराव्यांशी छेडछाड केली जात असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.
राजकीय पडसाद आणि पदाचा त्याग-
या प्रकरणाचे पडसाद केवळ नाशिकपुरते मर्यादित न राहता मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. अशोक खरातच्या पाद्यपूजेचे काही फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर विरोधकांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, त्यांची विश्वस्त मंडळावरील मुदत ऑगस्ट २०२५ मध्येच संपुष्टात आली आहे. मात्र, नैतिकतेच्या मुद्द्यावरून आणि वाढत्या राजकीय दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पदत्याग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
एसआयटी (SIT) कडून सखोल चौकशीचा घेरा-
सरकारने नियुक्त केलेले विशेष तपास पथक आता या संस्थानच्या आर्थिक व्यवहारांची, निर्णयप्रक्रियेची आणि जमिनीच्या व्यवहारांची मुळापासून चौकशी करत आहे. विश्वस्त मंडळाचा फलक अचानक गायब होणे, ही बाब तपासात महत्त्वाची मानली जात आहे. या फलकावर असलेल्या नावांच्या आधारे आणि मागील आर्थिक वर्षांतील व्यवहारांच्या नोंदीवरून सर्व आजी-माजी विश्वस्तांना चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची दाट शक्यता आहे. खरातने धर्मादाय आयुक्तांच्या नियमांचे उल्लंघन करून स्वतःच्या सोयीनुसार विश्वस्त मंडळ चालवले होते का, याचाही शोध घेतला जात आहे.
पुढील तपासाची दिशा-
अशोक खरात याच्या साम्राज्याला कोणाकोणाचे अभय लाभले होते आणि संस्थानच्या नावाखाली नेमके कोणते काळे धंदे सुरू होते, याचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस आता तांत्रिक पुराव्यांची मदत घेत आहेत. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले असून, शिवनिका संस्थानशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेची सूक्ष्म तपासणी केली जाणार आहे.










