एलआयसीने ‌‘अदानी‌’चे सर्व शेअर विकत घेतले!

मुंबई- एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाने दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत खळबळजनक व्यवहार केला आहे. एलआयसीने अदानी समूहाच्या अदानी पोर्टचे (बंदर) नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर विकत घेतले. ही खरेदी छोट्या रकमेची नाही. अदानी पोर्ट कंपनीने 5 हजार कोटीचे डिबेंचर जारी केले होते. ते सर्वच्या सर्व एलआयसीने विकत घेतले. अदानी समूहावर आजवर अनेक आरोप झाले आहेत. अमेरिकेत दोन गंभीर गुन्ह्यांबाबत त्यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी ट्रम्प सरकार सध्या दाबू शकत असले तरी चार वर्षांनी दुसरे सरकार आले तर अभय मिळेलच असे नाही. अदानीवर अत्यंत कडक कारवाई होऊ शकते. या सर्व आरोपांमुळे आताच अदानीची पत अब्जावधीने घटली आहे. अशा परिस्थितीत एलआयसीने जनतेचा पैसा पूर्णपणे अदानी पोर्टमध्ये गुंतवल्याने चलबिचल सुरू झाली आहे. एलआयसीने अदानी पोर्टचे सर्व शेअर एकाच दिवसात विकत घेण्याचा निर्णय घेतला तो मोदी सरकारच्या दबावातून घेतला असा आरोप आहे. काँग्रेसने या खरेदीविरोधात आवाज उठवला आहे. जुलै महिन्यात संसद अधिवेशनात हा प्रश्न गाजणार आहे. तूर्त एलआयसी मात्र अवाक्षर बोलण्यास तयार नाही. अदानी पोर्ट कंपनी अडचणीत सापडली तर एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेल्या 67 कोटी भारतीयांचे पैसे बुडणार आहेत.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात नोव्हेंबर 2024 मध्ये गौतम अदानी, त्यांचा भाचा सागर अदानी आणि इतर काहींवर गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. अमेरिकी गुंतवणुकदारांकडून दोन अब्ज 65 लाख डॉलर घेतले आणि ते भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी वापरले. ही अमेरिकन गुंतवणुकदारांची फसवणूक असल्याने अदानीवर गुन्हा दाखल होऊन चौकशी सुरू आहे. याबरोबर अलीकडे दुसऱ्या प्रकरणातही अदानी समूहाची चौकशी सुरू आहे. अमेरिकेने इराणकडून काही वस्तु घेण्यावर निर्बंध घातले आहेत. भारत व अमेरिकेत झालेल्या करारामुळे हे निर्बंध भारतानेही पाळायचे आहेत. असे असूनही अदानीने इराणकडून एलपीजी गॅस विकत घेतला आणि तो विविध बंदरांवर उतरवला. हे कराराचे उल्लंघन असल्याने अदानीची या प्रकरणात चौकशी सुरू आहे. यातही किती गॅस घेतला आणि कोणत्या बंदरात उतरवला ते दर्शविणाऱ्या कागदपत्रात अदानीने हेराफेरी केल्याचा आरोप आहे. अमेरिकेकडे गॅस खरेदी आणि तो नेमक्या कोणत्या बंदरांवर उतरवला त्याचे पक्के पुरावे आहेत. हा गुन्हा सिद्ध झाला तर अदानी समूह अडचणीत येणार आहे.
अदानी समूह अशा तऱ्हेने आरोपांच्या आणि चौकशीच्या सावटाखाली असताना एलआयसीने भारतीयांचे पैसे त्या कंपनीत का गुंतवले? हा सवाल विचारला जात आहे.