अमरावती – प्रहार संघटेनेचे नेते बच्चू कडू (Former MLA Bacchu Kadu)हे शेतकरी आणि दिव्यांगच्या विविध मागण्यासाठी ७ जूनपासून अन्नत्याग आंदोलन करत होते. आज सरकारच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलन (hunger strike) स्थगित केले. त्यांनी सरकारला ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. तोपर्यंत सरकारने काहीही पावले उचलली नाहीत तर मंत्रालयात येऊन आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या सहा दिवसांपासून राज्याचे मंत्री आणि सत्ताधारी पक्षांतील नेते बच्चू कडू यांनी भेट घेऊन आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांना करत होते. काल पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची ऑनलाइन बैठक झाली. पण त्यांनी कर्जमाफीची तारीख न सांगितल्याने चर्चा निष्फळ ठरली. तर आज सरकारतर्फे उद्योग मंत्री उदय सामंत हे बच्चू कडू यांच्याकडे लेखी आश्वासन घेऊन गेले. सरकारची भूमिका त्यांना सांगून आंदोलनकर्त्यांसमोर राज्य सरकारचे पत्र वाचून दाखवले.
यावेळी उदय सामंत म्हणाले की, शेतकरी कर्ज माफीसाठी १५ दिवसात सरकार उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे. ती समिती अहवाल तयार करेल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्ज माफीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देऊन नवीन कर्जवाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. दिव्यांगाच्या मानधन वाढीबाबत ३० जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. उर्वरित मुद्यावर संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील.
बच्चू कडू म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफीबद्दल बोलत नव्हते. पण प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर समिती तयार करू, असे आश्वासन त्यांनी दिले. ही आपली ताकद आहे. सरकार अजूनही कर्जमाफीची तारीख सांगत नाही. दिव्यांगाचे घर १५०० रुपयांत कसे चालेल ? राम ठाकरे या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर मी शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा उपोषण केले. सरकार राम मंदिरासाठी सर्व काही करत आहे. पण या रामहत्येचे पाप कसे फेडणार? मी केवळ माझ्या शेतकऱ्यांसाठी उपोषण स्थगित करत आहे. त्यांनी मला उपोषण सोडले नाही तर आत्महत्या करू असे संगितले. ऑक्टोबर महिन्यात खाऊन पिऊन हा बच्चू कडू पुन्हा आंदोलन करणार आहे. जे मंत्री मला भेटून गेले त्यांनीही मला काही आश्वासन दिले आहे. त्यामुळे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मी मुंबई (mumbai)बोलून नागपुरात आंदोलन करेन. जकोणी दिलेला शब्द पाळला नाही तर मंत्र्यांच्या घरासोमर आंदोलन करेन.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडू यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सरकारकडे त्यांनी केलेल्या मागण्यांवर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात लवकरच उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. दिव्यांग बांधवांच्या अनुदान वाढीसंदर्भात विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतूद वाढवून देऊ.
दरम्यान, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar)यांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घेतला. कर्जमाफी कधी करणार, असा जाब यावेळी कार्यकर्त्यांनी पवारांना विचारला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकल्या आणि पोलिसांना आंदोलकांना बाहेर घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ९ आंदोलकांना ताब्यात घेतले.