संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

नाट्याचार्य खाडिलकर

नीलकंठ खाडिलकर

आमच्या विषयी

नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक ‘नवाकाळ’ ची स्थापना केली. त्यांनी ‘नवाकाळ’ धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ( ९ फेब्रुवारी १९२९ ) भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार ‘नवाकाळ’ चे संपादकपद सोडले. मार्च १९२९ मध्ये त्यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंत कृष्णा उर्फ अप्पासाहेब खाडिलकर संपादक झाले. काकासाहेब तुरुंगातून जानेवारी १९३० साली परत आले. तथापि ते पुन्हा संपादक झाले नाहीत. या वेळी नाट्याचार्य यांचे वय ५८ होते. पण त्यांनी वेळीच स्वयंस्फूर्तीने संपादकपद सोडले! त्यांना थांबायचे कुठे? याची उत्तम जाण होती!

स्वत:हून संपादकपद सोडण्याची परंपरा

अप्पासाहेब खाडिलकरांनी त्यांच्या वयाच्या ६४व्या वर्षी १ ऑक्टोबर १९६९ रोजी दसरा सणाच्या दिवशी मोठ्या आनंदाने संपादकपद सोडले आणि नीलकंठ खाडिलकरांचे नाव संपादक, मुद्रक आणि प्रकाशक म्हणून जाहीर केले! हि नाट्याचार्यांचीच परंपरा! नीलकंठ खाडिलकर यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १९९७ साली मार्चमध्ये ‘नवाकाळ’ चे संपादकपद सोडले. त्यांची कन्या सौ. जयश्री रमाकांत-पांडे हिला संपादक, मुद्रक व प्रकाशन म्हणून जाहीर केले! मागोमाग डिसेंबर १९९८ मध्ये ‘संध्याकाळ’चे संपादकपद सोडले. सर्वांत लहान कन्या रोहिणी नीलकंठ खाडिलकर हिला संपादकपद दिले. सर्वांत पहिली कन्या वासंती उन्नी हिला व्यवस्थापक केले. पगार व ऑफिसचा सर्व हिशोब नीलकंठ खाडिलकर यांची पत्नी सौ. मंदाकिनी नीलकंठ खाडिलकर गेली १८ वर्ष सांभाळत आहेत.