मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाची ताकद एकत्र येऊ नये, यासाठी मालकांच्या म्हणजे अदानीच्या नोकरांचे प्रयत्न सुरू आहेत. आमची युती होऊ नये, असे त्यांना वाटत आहे. पण महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार. ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर भाजपाचे नामोनिशाण मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बातम्या सुरू आहेत. काय होणार? कसे होणार? होणार की नाही? होणार, कळेल ना. जे कार्यकर्त्यांच्या आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे. पण ते होऊ नये, मराठी माणसांची ताकद एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे, हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत. मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकाचे काय होणार? आम्ही मुंबई परत घेणारच आहोत. मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली, तर अदानीचे कसे होणार? त्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये, यासाठी शेठजी नोकर आणि जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करत आहेत, त्या शेठजींच्या नोकरांचे नोकर मुंबईत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत, पण शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल, तर तुमचे नामोनिशाण महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकू.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदेसेना आणि भाजपावर झोड उठवली. ते म्हणाले की, एवढी माणसे फोडली, पक्ष फोडला, चिन्ह चोरले, वडील चोरले तरी शिवसेना, हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही? पण त्यांना कल्पना नाही की, शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून, विचार पेरून हे शिवसेना नावाचे वादळ निर्माण केले आहे. ही पैसे फेकून जमवलेली माणसे नाहीत. विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदूत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत. मला किव वाटते की, जे आपला बाप बदलतात, ज्यांना राजकारणात पोरे होत नाहीत, ते आमच्या घराणेशाहीवर टीका करत आहेत. तुला राजकारणात पोरे होत नाहीत, त्याला आम्ही काय करू? आमच्याकडे आहेत, घ्यायची तर घे. किती पाहिजेत? कारण भाजपा असाच आहे. हे सत्य आहे. भाजपाविषयी क्या हुआ तेरा वादा, असेच म्हणायला हवे. आतापर्यंत यांनी जे केले ते सगळे फसवे होते. निवडणूक जिंकण्यासाठी ते माताभगिनीशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा पाळत नाहीत. मग ते माझ्याशी केलेला वादा कसा पाळतील? अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा वादा केला नव्हता असे म्हणतात. मग माताभगिनीला केलेला वादा तरी खरा होता की नव्हता? केंद्रात सरकार आल्यापासून देशाला पनवती लागली आहे. एअरपोर्टचे छत गळतेय, मेट्रो स्टेशन गळतेय, प्रयागराजला लोक मेली, रेल्वे अपघात झाला, विमान अपघात झाला. पण कोणी जबाबदारी घेत नाही. आज देशाला पंतप्रधानांची गरज आहे. भाजपाला पंतप्रधान आहे, पण देशाला नाही. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शहाची नाही. देशाला संरक्षणमंत्र्याची गरज आहे. गुंडाला संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे? आम्ही इंडिया आघाडी उभी केली तर इंडियन मुजाहिद्दीन बरोबर आमची तुलना करता! आम्ही इंडियन मुजाहिद्दीनसारखे होतो तर तुम्ही न केलेल्या शौर्याचे कौतुक जगात करायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले? यांना नावे चांगली सुचतात. तर काय ऑपरेशन सिंदूर! हे घरोघरी जाऊन सिंदूर वाटणार होते. सिंदूर कोण वाटणार? ज्यांना जोड्याने हाणले असे हे भ्रष्ट भाजपावाले, माझ्या माता-भगिनींना जाऊन सिंदूर वाटणार आणि त्या हे सिंदूर घेणार, असे वाटले यांना. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला सांगितले आहे की, आमचे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व. जो हा देश आपला मानतो. या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो कुणीही असला तरी आमचा आहे. भारताची बाजू बाणेदारपणाने मांडणाऱ्या सोफिया कुरेशीला पाकिस्तानची, दहशतवाद्यांची बहीण म्हणतो त्याला सिंदूर घेऊन पाठवता. अशी नालायक औलाद भाजपामध्ये आहे. तुम्ही सैन्याचे पाय बांधलेत. ट्रम्पचा फोन आल्यावर तुमचा आवाज गेला. काय करायचे असे पंतप्रधान, असे गृहमंत्री? पहलगामचे चार अतिरेकी कुठे गेले आकाशात, पाताळात की, भाजपात? घेतलेपण असतील. आता फक्त दाऊदला घ्यायचे बाकी आहे. भाजपाने नवीन सदस्य नोंदणी सुरू केली. जेलच्या तुरुंगाबाहेरच स्टॉल टाकला आहे. इथे येतो की तिथे जातो. लोकांना आयुष्यातून उठवायचे. भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोंब करायचे. एसआयटी लावू, हे लावू, ते लावू. मग एसआयटीची एसटी झाली का?
