Sharad Pawar Flood Relief: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाड्यासह ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारला 5 महत्त्वाच्या सूचना करत एकप्रकारे अल्टिमेटम दिला आहे.
शरद पवार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ) या सोशल मीडिया माध्यमावर ही भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, शासनाने मदत आणि पुनर्वसनाची ही कामे तातडीने हाती घ्यावी लागतील, अन्यथा परिस्थिती गंभीर होईल.
राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपुर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे मी सुचवू…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 28, 2025
संकटग्रस्तांसाठी शरद पवारांच्या सरकारकडे 5 कडक मागण्या
१. पंचनामा प्रक्रीयेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे.
अभुतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे. पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्यशासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानाची दखल घेतली जात नाही. उदा. अतीवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तू यांची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशूधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. अशा नुकसानीचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी.
२. नुकसान भरपाई सोबत पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे.
– वस्तुत: आपदग्रस्तांना दिली जाणारी मदत ही नुकसान भरपाई नसून अंशत: दिलासा असतो. शेतकरी व सामान्य जनता आपत्तीने कोलमडून गेली असल्याने ह्या नुकसान भरपाई सोबतच पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा. ह्यात पिकांच्या पुनर्पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत , फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष मदत यांचा समावेश असावा.
– वाहून गेलेली किंवा नापीक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा. लहान-मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा व इतर सिंचन साधनांची दुरुस्ती व गाळ काढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या बांध-बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत. पुनर्बांधणी व पुनरूज्जीवनाची कामे मनरेगा कामांतून कशी होतील, आपदग्रस्तांच्या हातांना काम कसे मिळेल याचे देखील नियोजन करावे.
– शाळा, आरोग्य, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार करावा. पाऊस कमी झाल्यावर व पूर ओसरल्यानंतर ह्या आराखडयाची अंमलबजावणी तातडीने कशी होईल याकडे लक्ष द्यावे.
३. साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा.
अतीवृष्टी आणि पूराने नागरीकांचे संसारपयोगी साहित्य (भांडी, कपडालत्ता, फर्निचर वगैरे) नष्ट झाले आहे. शालेय साहित्य, चारा व शेतीची साधने, व्यवसायिक साहित्य यांची नासधूस झाली आहे. ह्या जंगम वस्तूंचा देखील पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात याव्यात.
४. शेतकरी हिताचे निर्णय.
– पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल. खाजगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे.
– वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यवसायिक यांच्याकडून होणारी वसूली तात्काळ तहकूब करावी आणि शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.
५. मानसिक व सामाजिक आधार.
– आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत. बाधीत व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, याकडे सत्वर लक्ष द्यावे.
शरद पवार यांनी त्यांच्या आवाहनात, या अभूतपूर्व संकटात शासकीय यंत्रणा काम करत असल्याबद्दल कौतुक केले आहे, पण त्याचबरोबर तातडीच्या आणि मोठ्या निर्णयांची गरज असल्याचे ठामपणे सांगितले आहे.