Rs 500 Note Ban News : मार्च 2026 पासून 500 रुपयांची नोट बंद होणार? एटीएममधून या नोटा मिळणे बंद होईल का? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरणाऱ्या अशा पोस्ट आणि व्हिडिओंनी सर्वसामान्यांना चिंतेत टाकले आहे.
मात्र, तुम्हीही या बातम्यांमुळे चिंतेत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. 500 रुपयांच्या नोटेबाबत कोणतीही नोटबंदी होणार नसून, ती चलनातून बाहेर काढण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.
पीआयबीने सांगितले सत्य
सोशल मीडियावरील या दाव्यांची दखल घेत केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 500 रुपयांची नोट पूर्णपणे वैध असून ती देशभर पूर्वीप्रमाणेच व्यवहारात सुरू राहील.
“चुकीच्या माहितीपासून सावध राहा आणि कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा ती शेअर करण्यापूर्वी सरकारी अधिकृत स्त्रोताकडून खात्री करा,” असे आवाहनही सरकारने केले आहे.
RBI to stop ₹500 notes from ATMs by March 2026❓🤔
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 2, 2026
Some social media posts claim that the Reserve Bank of India will discontinue the circulation of ₹500 notes by March 2026.#PIBFactCheck:
❌This claim is #fake!
✅ @RBI has made NO such announcement.
✅ ₹500 notes have… pic.twitter.com/F0Y3t0wHSf
या अफवा का पसरल्या?
एका युट्यूब व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला होता की, मार्च 2026 पासून एटीएममध्ये केवळ 100 आणि 200 रुपयांच्या नोटा उपलब्ध असतील आणि 500 ची नोट हळूहळू बाद केली जाईल. देशातील बहुतांश एटीएममध्ये 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रत्यक्षात, जर ही नोट बंद झाली असती, तर रोकड काढताना मोठी अडचण निर्माण झाली असती. मात्र, असा कोणताही निर्णय झालेला नाही.
मंत्रालयाचे संसदेतील उत्तर
यापूर्वी ऑगस्ट 2025 मध्येही संसदेत या विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले होते की, 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही. एटीएममध्ये 100, 200 आणि 500 अशा तिन्ही मूल्यांच्या नोटा उपलब्ध राहतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये, ही नोट सुरक्षित आहे.
हे देखील वाचा – Devendra Fadnavis: “दोघांची ताकद संपल्यावर ते एकत्र आलेत!” ठाकरे बंधूंच्या युतीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती प्रहार














