Ajit Pawar Passes Away: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगता आणि संघर्षशील लोकनेता हरपला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण राज्य शोकाकुल झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
“महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला आणि जनतेच्या मनातील नेता आज आपल्यातून गेला आहे, ही हानी कधीही भरून न येणारी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“माझा दिलदार मित्र गेला” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अजित पवारांच्या जाण्याने वैयक्तिकरीत्या मोठे नुकसान झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांचा कंठ दाटून आला होता. फडणवीस म्हणाले की, ज्या काळात महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर होता, त्या काळात अजित दादांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे. हा आघात केवळ त्यांच्या कुटुंबावर नाही, तर संपूर्ण राज्यावर आहे. अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक दशके लागतात. संघर्ष करून उभे राहिलेले हे व्यक्तिमत्व कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जात असे.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दिली आहे. तसेच त्यांनी सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशीही चर्चा केली असून, अंतिम संस्कारांचे निर्णय कुटुंबाच्या संमतीने घेतले जातील.
राज्यात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा
या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:
- आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
- संपूर्ण महाराष्ट्रात 3 दिवसांचा दुखवटा पाळला जाणार आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली
पंतप्रधान मोदींनी अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त करताना त्यांना ‘मेहनती व्यक्तिमत्त्व’ म्हणून संबोधित केले. ते म्हणाले की, “अजित पवार हे तळागाळातील लोकांशी नाळ जोडलेले खऱ्या अर्थाने लोकनेते होते. प्रशासकीय कामाची त्यांना असलेली विलक्षण जाण आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी असलेली त्यांची तळमळ सदैव लक्षात राहील. त्यांचे अकाली जाणे अत्यंत धक्कादायक आहे.”









