T20 World Cup 2026 Semi-Final: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या हाय-व्होल्टेज सेमीफायनलकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र, पावसाच्या शक्यतेमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, जर सामना पावसामुळे झाला नाही तर फायनलमध्ये कोण जाणार, याबाबतची चर्चा रंगली आहे. आयसीसीने या बाद फेरीच्या सामन्यांसाठी काही विशेष नियम बनवले आहेत.
राखीव दिवसाची तरतूद काय?
आयसीसीने दोन्ही सेमीफायनलसाठी ‘रिझर्व्ह डे’ म्हणजेच राखीव दिवसाची तरतूद केली आहे. जर गुरुवारी सामन्यात व्यत्यय आला, तर त्याच दिवशी अतिरिक्त 90 मिनिटे दिली जातील. तरीही सामना पूर्ण न झाल्यास, शुक्रवारी (6 मार्च) 120 मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाईल. सामना अधिकृत होण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5 षटके खेळणे आवश्यक आहे.
सामना रद्द झाला तर भारत बाहेर होणार?
दुर्दैवाने दोन्ही दिवशी मुसळधार पाऊस पडून सामना अजिबात होऊ शकला नाही, तर सुपर ओव्हर किंवा बाउंड्री काउंटचा विचार केला जाणार नाही. अशा स्थितीत जो संघ आपल्या सुपर 8 ग्रुपमध्ये अव्वल स्थानी होता, तो थेट फायनलमध्ये पोहोचेल.
- इंग्लंडची स्थिती: इंग्लंडने ग्रुप 2 मध्ये सर्व सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे.
- भारताची स्थिती: भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने ते ग्रुप 1 मध्ये दुसऱ्या स्थानी राहिले. त्यामुळे सामना पूर्णपणे रद्द झाल्यास इंग्लंड फायनलमध्ये जाईल आणि टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात येईल.
हवामानाचा अंदाज आणि खेळपट्टी
सुदैवाने, मुंबईतील हवामानाचा अंदाज क्रिकेटप्रेमींसाठी दिलासादायक आहे. 5 मार्च रोजी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून पावसाचे सावट नाही. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे येथे धावांचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारख्या खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
कधी आणि कुठे पाहाल सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना 5 मार्चला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 6:30 वाजता होईल. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि मोबाईलवर ‘जिओ हॉटस्टार’ ॲपवर थेट प्रसारित केला जाईल.










