Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या खरातचे राजकीय कनेक्शन आता समोर येत असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. खरातला कोणत्या नेत्याने किती वेळा फोन केला, याची धक्कादायक आकडेवारीच या दोन्ही नेत्यांनी जाहीर केली आहे.
कोणाचे किती कॉल्स? दमानियांचा खळबळजनक दावा
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक खरातच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्सची माहिती उघड केली. त्यांच्या दाव्यानुसार:
- एकनाथ शिंदे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरातला एकूण 17 कॉल्स झाले आहेत. यामध्ये 10 इनकमिंग आणि 7 आऊटगोईंग कॉल्सचा समावेश असून, एकदा त्यांचे 21 मिनिटे संभाषण झाले आहे.
- रूपाली चाकणकर: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स खरातला झाले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या बहिणीचेही 236 कॉल्स रेकॉर्डवर आहेत. चाकणकर यांनी खरातसोबत तब्बल 33,727 सेकंद संवाद साधला आहे.
- इतर दिग्गज: भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आणि आशिष शेलार यांचा 1 कॉल खरातला गेल्याचा आरोप दमानियांनी केला आहे.
सुषमा अंधारे यांचा फेसबुकवरून हल्लाबोल
सुषमा अंधारे यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. “एका भोंदू बाबासोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे 17 वेळा काय बोलणे झाले? हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे,” असे अंधारे यांनी म्हटले आहे. व्हॉट्सॲप कॉल्सची माहिती मिळत नसली तरी, साध्या कॉल्सची ही यादीच खरातचे राजकीय वजन स्पष्ट करण्यासाठी पुरेशी असल्याचे त्यांनी नमूद केले.
एसआयटी चौकशीकडे सर्वांचे लक्ष
अशोक खरात सध्या एसआयटीच्या (SIT) ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला फक्त फोटोंपुरती मर्यादित असलेली ही चर्चा आता थेट ‘कॉल रेकॉर्ड्स’पर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या नेत्यांचे एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भोंदू बाबाशी काय काम होते? या प्रश्नाचे उत्तर आता विरोधक मागत आहेत.
या आरोपांमुळे आता मुख्यमंत्री कार्यालय आणि रूपाली चाकणकर यावर काय स्पष्टीकरण देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.











