Sharad Pawar : वारकरी संप्रदायासारख्या अत्यंत वैभवशाली आणि समतेचा संदेश देणाऱ्या चळवळीत अलीकडच्या काळात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली आहे, असे परखड मत ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. दिल्ली येथे आयोजित ‘महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय साहित्य संमेलना’च्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत त्यांनी आपले विचार मांडले आहेत. या संमेलनाचे उद्घाटन आज संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार असून, त्यापूर्वीच शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील वैचारिक बदलांवर भाष्य करून एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी-
शरद पवार यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, वारकरी संप्रदायामध्ये सध्या सुमारे ६० टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आणि समाजाला मागे नेणारी आहे. ज्या संप्रदायाने शतकानुशतके समता आणि माणुसकीची शिकवण दिली, तिथे आता प्रतिगामी विचारांचा प्रभाव वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रवाहाचा प्रतिकार करण्यासाठी आता पुरोगामी भूमिका घेणाऱ्या प्रवचनकार आणि कीर्तनकारांची यादी तयार करण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या अशा विचारांचे केवळ ४० लोक कार्यरत असून, प्रबोधनाच्या या मार्गावर महिलांचा सहभाग नगण्य असल्याबद्दल पवारांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे.
आईच्या कर्तृत्वाचा वारसा आणि महिला धोरण-
केंद्रीय मंत्री असताना महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखण्यामागची प्रेरणा स्पष्ट करताना पवारांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “माझ्या जीवनावर आईचा अत्यंत मोठा प्रभाव आहे. ज्या काळात दळणवळणाची साधने मर्यादित होती, त्या काळी माझी आई जिल्हा लोक बोर्डाच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यातून निवडून आली होती. एकही बैठक न चुकवता आणि पूर्ण अभ्यास करून सभेला उपस्थित राहण्याची तिची शिस्त आजही प्रेरणादायी आहे.” आईच्या याच कर्तृत्वामुळे आणि सामाजिक भान असल्यामुळेच महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष धोरणे आखण्याची गरज भासली, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
साहित्य संमेलनाचे स्वरूप-
महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या या पहिल्या ऐतिहासिक साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिलांच्या साहित्यिक गुणांना वाव देणे आणि त्यांच्या अनुभवांचे संकलन करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.











