Maharashtra Monsoon 2026 : देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या नैऋत्य मान्सूनबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) आपला पहिला अधिकृत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. २०२६ च्या पावसाळ्यात देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी देशात सरासरीच्या केवळ ९२ टक्के पर्जन्यमानाची नोंद होऊ शकते.
महाराष्ट्रातील सर्वच विभागांत पावसाची ओढ-
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ देशपातळीवरच नव्हे, तर महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण सामान्य सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. राज्याचा विचार करता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्वच विभागांत पावसाची ओढ जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सरासरीच्या ९० ते ९५ टक्के पाऊस पडण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पेरण्यांच्या नियोजनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘अल निनो’चा प्रभाव आणि समुद्रातील सकारात्मक स्थिती-
मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ‘अल निनो’ (El Niño) परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. सामान्यतः ‘अल निनो’मुळे मान्सूनवर नकारात्मक परिणाम होऊन पाऊस कमी पडतो. मात्र, डॉ. मोहापात्रा यांनी एक दिलासादायक माहिती देखील दिली आहे. त्याच कालावधीत भारतीय समुद्रामध्ये (Indian Ocean Dipole) सकारात्मक स्थिती निर्माण होत आहे. ही सकारात्मक स्थिती ‘अल निनो’चा नकारात्मक प्रभाव काही प्रमाणात कमी करण्यास मदत करेल. त्यामुळे सुरुवातीचे महिने म्हणजेच जून ते ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाच्या पावसाच्या पाच श्रेणी-
पाऊस मोजण्यासाठी हवामान विभागाने निश्चित केलेल्या पाच प्रमुख श्रेणी खालीलप्रमाणे आहेत-
अपुरा पाऊस: सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी.
सरासरीपेक्षा कमी: ९० ते ९५ टक्क्यांच्या दरम्यान (यंदाचा अंदाज याच श्रेणीत आहे).
सामान्य पाऊस: ९६ ते १०४ टक्क्यांच्या दरम्यान.
सरासरीपेक्षा अधिक: १०५ ते ११० टक्क्यांच्या दरम्यान.
अतिवृष्टी / सर्वाधिक पाऊस: ११० टक्क्यांपेक्षा जास्त.
शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक काळ
हवामान विभागाच्या या अंदाजामुळे यंदा जलसाठ्यांचे नियोजन आणि पिकांची निवड करताना शेतकऱ्यांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. जुलै-ऑगस्ट दरम्यान पावसाची स्थिती कशी राहते, यावर खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असेल.









