Sanjay Raut : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांच्या निवडणूक निकालांवरून देशातील लोकशाहीच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. विरोधी पक्षांचे अस्तित्वच नष्ट करण्याचे सत्ताधारी पक्षाचे धोरण लोकशाहीसाठी ‘धोक्याची घंटा’ असल्याचे त्यांनी नमूद केले. जर सत्ताधाऱ्यांना विरोधक नको असतील, तर आगामी काळात विरोधी पक्षांनी निवडणुका लढवणेच सोडून द्यावे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, “पंतप्रधान, गृहमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ वर्षाचे ३६५ दिवस केवळ निवडणुकांचेच नियोजन करत असते. विकास, रोजगार आणि महिला सुरक्षा यांसारखे मूलभूत प्रश्न त्यांच्या खिजगणतीतही नाहीत.” जगामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना देशाचे पंतप्रधान दोन महिने राज्यांच्या प्रचारात व्यस्त राहतात आणि गृहमंत्री सत्तेचा व पैशाचा वापर करून निकालांवर प्रभाव टाकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. सत्तेचा हा नंगानाच लोकशाहीच्या तत्त्वांना हरताळ फासणारा असल्याचे त्यांचे मत आहे.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर शंका उपस्थित करताना राऊत यांनी भारताची तुलना पाकिस्तान, रशिया आणि अझरबैजानसारख्या देशांशी केली. रशियात ज्याप्रमाणे पुतिन यांचा विजय आधीच निश्चित असतो किंवा अझरबैजानमध्ये निकालापूर्वीच निकाल जाहीर होतात, तसाच प्रकार भारतातही घडत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. “लाखो मतदारांची नावे कापून आणि निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवणे हा लोकशाहीचा उत्सव नसून लोकशाहीच्या छातीवर केलेला नाच आहे,” असे जळजळीत उद्गार त्यांनी काढले.
या राजकीय संघर्षात ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य उज्वल असल्याचे सांगताना त्यांनी ऐतिहासिक दाखला दिला. इंदिरा गांधी जेव्हा सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर होत्या, तेव्हाच त्यांच्या पतनाला सुरुवात झाली होती; आज पंतप्रधान मोदींची स्थितीही तशीच आहे, असा दावा राऊत यांनी केला.










