Ebola Alert : आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी एक महत्त्वाची नियमावली (Advisory) जारी केली असून, यामध्ये ‘उच्च जोखीम’ असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. भारताचे प्रवेश मार्ग असलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर, बंदरांवर आणि भू-सीमांवरील आरोग्य केंद्रांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार, जे प्रवासी लोकशाही प्रजासत्ताक काँगो (DR Congo), युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांतून भारतात येत आहेत किंवा या देशांतून प्रवास करून आले आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. जर कोणत्याही प्रवाशाला ताप, कमालीचा अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या, जुलाब, घसा खवखवणे किंवा शरीरातून अनपेक्षित रक्तस्त्राव होणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी इमिग्रेशन तपासणीपूर्वी विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांशी किंवा आरोग्य कक्षाशी (Health Desk) संपर्क साधणे अनिवार्य आहे. तसेच, इबोलाची लागण झालेल्या किंवा संशयित व्यक्तीच्या रक्ताशी किंवा शारीरिक द्रव्याशी प्रत्यक्ष संपर्क आला असल्यास, अशा व्यक्तींनीही स्वतःहून आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या आठवड्यात इबोलाच्या उद्रेकाला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे. या विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्या सलिला श्रीवास्तव यांनी बुधवारी राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यांना सर्व आघाड्यांवर सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. प्रवाशांची आगमनपूर्व आणि आगमनोत्तर तपासणी, विलगीकरण (Quarantine) नियम, रुग्ण व्यवस्थापन, प्रयोगशाळा चाचणी आणि संशयित रुग्णांना संदर्भित करण्याची यंत्रणा (Referral Mechanism) यांबाबतच्या ‘प्रमाणित कार्यपद्धती’ (SOPs) सर्व राज्यांशी सामायिक करण्यात आल्या आहेत.
इबोला हा ‘ऑर्थोइबोला व्हायरस’ कुटुंबातील एक अत्यंत घातक असा ‘झुनोटिक’ (प्राण्यांपासून मानवात पसरणारा) संसर्ग आहे. हा विषाणू मानवाकडून मानवाकडे संक्रमित होण्यासाठी संक्रमित व्यक्तीचे रक्त, लाळ, घाम, अश्रू, उलट्या, विष्ठा किंवा आईचे दूध यांसारख्या शारीरिक द्रव्यांशी प्रत्यक्ष संपर्क येणे कारणीभूत ठरते. तसेच, दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने किंवा इबोलामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाशी संपर्क आल्यानेही हा आजार पसरू शकतो. या आजाराची लक्षणे सुरुवातीला तापासारखी भासतात, मात्र शरीराच्या अंतर्गत किंवा बाह्य भागातून अनपेक्षित रक्तस्त्राव होणे हे या आजाराचे सर्वात भीषण आणि वेगळे लक्षण मानले जाते.
आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सध्या भारतात इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलली जात आहेत. प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांचे पालन करावे आणि सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आरोग्य तपासणीत पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










